रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने पुण्यातील संगीत, नृत्य आणि रंगभूमी कलाकारांबरोबर आयोजित स्नेहसंवाद
पुणेः भारतीय संस्कृती आणि सभ्यता खोलवर रुजलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ही संस्कृती आणि सभ्यता समृद्ध करण्याची गरज होती. परंतु ते चुकले आणि भारताचे मोठे नुकसान झाले. विविध क्षेत्रांतील गुरुंनी त्या त्या काळात परंपरा कायम राखली. आज भारताचा जगात वेगळा सन्मान होत आहे. भारताच्या संस्कृतीची पुर्नस्थापना होत असून, या संस्कृतीवर आणि भारतीय असण्यावर गर्व करण्याचा आजचा काळ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने पुण्यातील संगीत, नृत्य आणि रंगभूमी कलाकारांबरोबर आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात शेखावत बोलत होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत बडवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सतार वादक उस्ताद उस्मान खॉ, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, नाटककार सतीश आळेकर, व्याख्याता संजय उपाध्ये, तबलावादक केदार पंडित, चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, योगेश देशपांडे, उमेश कुलकर्णी, प्रविण तरडे व गिरीश परदेशी, नाट्य निर्माता अनंत पणशीकर, जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर, शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी, मंजुषा पाटील, पंडीत सुहास व्यास, हृषिकेश रानडे, कथक नृत्यगुरु शमा भाटे, मनीषा साठे, आळंदी देवस्थानचे डॉ. भावार्थ देखणे, सुनील महाजन यांनी चर्चेत सहभाग घेतला.
शेखावत पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान, स्थापत्यकला आदींचे जगाला आश्चर्य वाटावे असे योगदान आहे. काळाच्या ओघात जगातील सभ्यता संपत असताना, भारतात मात्र हजारो वर्षांपासून सभ्यता आणि संस्कृती प्रवाही राहीली. हा प्रवाह जीवंत राहण्यासाठी विविध क्षेत्रांतील गुरुंनी मोठे योगदान दिले आहे. या क्षेत्रांतील विविध घटकांना प्रोत्साहन, प्रेरणा आणि मदत देण्याचे काम सांस्कृतिक मंत्रालय अविरत करेल. इंटरनेट क्रांतिनंतर बौद्धिक प्रदूषणाचे आव्हान निर्माण झाले आहे. आपल्या समृद्ध परंपरा नवीन पीढीकडे संक्रमित करण्यासाठी सरकार आणि समाजाच्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील. त्या मध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असेल.
सहस्रबुद्धे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशिष्ट धोरण दृष्टी आहे. परंपरेचे भान राखून विकास केला जातो. पुणे ही प्रतिभावंतांची भूमी आहे. संवादाची प्रक्रिया हा लोकशाहीचा गाभा आहे. कला क्षेत्रातील मंडळी साधना करणारी असतात. नेतृत्व ही देखील एक साधना आहे. कला क्षेत्रातील साधकांच्या भावना जाणून घेण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पांडे म्हणाले, पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. नुकत्याच झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात दहा लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिली. पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी करायची आहे. पुण्यातील कलाकारांच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या जाणून घेण्यासाठी स्नेहसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी गुरुकुल पद्धत आणावी, प्रायोगिक कलांसाठी राज्य विद्यापीठांना निधी द्यावा, नाटकांचे आंतरराज्य आदानप्रदान व्हावे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर हिंदी प्रमाणे अन्य भाषेत नाटकांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षण द्यावे, बाल चित्रपट समिती पुर्नगठीत करावी, एकपात्री कलाकार आणि सूत्रसंचालकांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात शास्त्रीय नृत्यांचा समावेश करावा, डिजिटल इंडियाच्या धर्तीवर क्रिएटिव्ह इंडिया धोरण आखावे, लोकसंगीत टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, शासकीय वाहिन्यांवर शास्त्रीय संगीताला स्थान द्यावे, आळंदीत संगीत, नाटक अकादमीच्या सहायाने केंद्र सुरू करावे, केंद्र स्तरावर समिती स्थापन करून त्यावर राज्यातील कलाकारांना संधी द्यावी, कानसेन निर्मितीसाठी अकादमी स्थापन करावी, नृत्य शिक्षक या पदाची शाळांमध्ये निर्मिती करावी, विशेष मुलांना कला शिकविण्यासाठी निधी द्यावा, वंदेमातरमच्या 150 व्या वर्षानिमित्त कार्यक्रम करावेत, वृद्ध कलाकारांचे संमेलन आयोजित करावे, शिलालेख आणि मूर्त्यांचे जतन करावे अशा प्रकारच्या सुचना करण्यात आल्या.
राजेश पांडे यांनी प्रास्ताविक, मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि श्रीकांत बडवे यांनी आभार प्रदर्शन केले.
